भिवंडी : ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील गोरसई येथे ६३वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, सणसवाडी (पुणे) येथील बुद्धिस्ट मूव्हमेंट सेंटरचे सुनील भवार, एस. बी. गायकवाड, बँक व्यवस्थापक शिवनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गायकवाड या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाच लाख नागरिकांना नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. तो दिवस म्हणजे १४ ऑक्टोबर. १४ ऑक्टोबर १९५६ला आंबेडकरांनी सोन्यासारखा धम्म दिला आहे. त्याचे रक्षण करणे आपले काम आहे. त्याचा प्रचार, प्रसार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण बुद्ध धम्मामुळे आपले परिवर्तन झाले असून, आपल्या जीवनाचे सोने झाले आहे,’ असे प्रा. शुक्राचार्य गायकवाड म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पँथर यशवंत गायकवाड यांनी केले. सुंदर रांगोळी रेखाटल्याबद्दल संतोष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बौद्धाचार्य दत्तू गायकवाड, सरपंच आनंद गायकवाड, रामदास जाधव, नागेश गायकवाड, गणेश गायकवाड, मुकेश गायकवाड, उमेश गायकवाड, अरुण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. आभारप्रदर्शन सरपंच आनंद गायकवाड यांनी केले.